पृष्ठे

प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके
जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन्द्रैः |
इति महति विरोधे वर्तमाने समाने
नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ||

- राजाचे हित पहाणारा जो असतो त्याचा सामान्य लोक द्वेष करतात. लोकांचे हित पाहणारा राजाकडून दूर सारला जातो. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी सारखाच विरोध होत असताना राजा आणि प्रजा यांचे सारखेच हित पाहाणारा कार्यकर्ता दुर्लभ असतो.
अनेकशास्त्रं बहु वेदितव्यमल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः |
यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ||

- शिकायला पुष्कळ शास्त्रे आहेत , खूप काही जाणण्यासारखे आहे पण काळ थोडा आहे आणि अडचणी भरपूर. म्हणून ज्याप्रमाणे हंस पाण्यापासून दूध वेगळे करून घेतो त्याप्रमाणे माणसाने जे काही सार असेल (उत्तम असेल) त्याची निष्ठेने उपासना करावी .
अफलानि दुरन्तानि समव्ययफलानि च |
अशक्यानि च वस्तूनि नारभेत् विचक्षणः ||

- निष्फळ होणारी, न संपणारी, केलेला खर्च आणि मिळालेले फळ सारखेच असणारी तसेच अशक्य असणारी कामे शहाण्या माणसाने हाती घेऊ नयेत.
निर्वाणदीपे किमु तैलदानं चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलासः पयोगते किं खलु सेतुबन्धः ।।

-  दिवा विझल्यानंतर त्यात तेल घालून काय उपयोग? चोर येऊन चोरी करून गेल्यानंतर सावधगिरी बाळगून काय उपयोग ? वय निघून गेल्यावर सुंदर स्त्रियांचा सहवास काय कामाचा? आणि पूर आल्यानंतर बांध घालून काय उपयोग?
प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते. ती निघून गेल्यावर काही करून उपयोग नसतो. 
परिश्रमो मिताहारो भूगतौ अश्विनिसुतौ |
तावनादृत्य नैवाहं वैद्यमन्यं समाश्रये ||

-  भरपूर शारीरिक कष्ट आणि मोजका आहार हे ह्या पृथ्वीवरील दोन अश्विनीकुमार (वैद्य) आहेत. त्यांचा अनादर करून मी इतर कोणत्याच वैद्याचा आश्रय घेत नाही. 
परोपदेशवेलायां शिष्टाः सर्वे भवन्ति वै |
विस्मरन्ति तु शिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते ||

- दुसऱ्यांना उपदेश करायची वेळ आली म्हणजे सगळेच शहाणे असतात. पण स्वतःचे काही काम असेल तर मात्र हे शहाणपण विसरतात.
क्वचिद् वीणावाद्यं, क्वचिदपि च 'हा हा ' इति रुदितं
क्वचिद् रामा रम्या, क्वचिदपि जराजर्जरतनुः |
क्वचिद् विद्वद्गोष्ठी , क्वचिदपि सुरामत्तकलहः
न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः ||

-  कधी वीणेचे मधुर वादन तर कधी मोठमोठ्याने रडणे, कधी सुंदर स्त्रीमध्ये रमणे तर कधी म्हातारपणाने विकलांग झालेले शरीर, कधी विद्वान लोकांबरोबर चर्चा तर कधी दारूच्या नशेत केलेली भांडणे ,असे सर्व असताना हे जग अमृतासारखे आहे का विषासारखे - कोण जाणे? 
सुखस्य दुःखस्य न कोSपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा |
'अहं करोमि' इति वृथाSभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः ||

-  सुख काय किंवा दुःख काय ते देणारा असा दुसरा कोणीतरी आहे असे म्हणणे चुकीचेच आहे. 'मी करतो /माझ्यामुळे होते' असा खोटा अभिमान आणि स्वतःच्याच कर्मामुळे हे जग दुःखी होते.
वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैर्तनूमार्जनं
भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |
पाठ्यं संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे
हा हा हन्त ! तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

(शुकान्योक्ति)

-पोपट म्हणतो - अत्यंत बुद्धिमान अशा मला येथे राजाकडे सोन्याच्या पिंजऱ्यात रहायला मिळत आहे. राजा स्वतःच्या कमळासारख्या हाताने माझे शरीर स्वच्छ करतो . मला येथे अत्यंत स्वादिष्ट आणि रसाळ असे डाळिंब खायला मिळते आणि अमृतासारखे पेय प्यायला मिळते. राजसभेत मी सतत रामाचे नाव पठण करीत असतो . (अशी सर्व सुखे असूनही) पण अरेरे! तरीही माझे मन मात्र माझा जन्म जिथे झाला त्या झाडाच्या ढोलीकडेच धाव घेत आहे. 
हस्ती स्थूलतनुः चाङ्कुशवशः किं हस्तिमात्रोSङ्कुशः ?
वज्रेणाभिहताः पतन्ति गिरयः किं शैलमात्रः पविः ?
 प्रज्ज्वलिते विनश्यति तमः किं दीपमात्रं तमः ?
तेजो यस्य विराजते स बलवान् स्थुलेषु कः प्रत्ययः ?

- हत्ती शरीराने मोठा असला तरीही एक लहानसा अंकुश वापरून वठणीवर येऊ शकतो पण कधी हत्ती अंकुशावर नियंत्रण ठेवू शकतो काय? वज्राने आघात केला असता मोठे पर्वत कोसळून पडतात पण पर्वत त्या शस्त्राचे काही वाकडे करू शकतो काय? दिवा लावला असता अंधार नष्ट होतो पण अंधारामुळे दिव्याचा नाश होतो काय? म्हणजेच ज्याच्याकडे तेज आहे तो बलवान ठरतो . नुसताच आकाराने मोठा असणाऱ्याच्या अधीन कोणी असत नाही .
उदयति यदि भानुः पश्चिमे दिग्विभागे |
प्रचलति यदि मेरुः  शीततां याति वह्निः |
विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां |
न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचित् ||

- सूर्य एकवेळ पश्चिम दिशेला उगवेल, पर्वत जागचा हलेल , अग्नी थंड होईल , उंच पर्वतावरच्या टोकावर असलेल्या एका दगडावर कमळ उगवेल पण सज्जन माणूस आपला शब्द फिरविणार नाही .
गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा |
अथवा विद्यया विद्या चतुर्थी नोपपद्यते ||

- विद्या मिळविण्याचे तीनच मार्ग आहेत - गुरूची सेवा करून, पुष्कळ धन देऊन किंवा आपल्याजवळची विद्या दुसऱ्याला देऊन (दुसऱ्याला शिकवून किंवा आपले ज्ञान दुसऱ्याबरोबर वाटून ). ह्याव्यतिरिक्त चौथा कोणताच मार्ग नाही.

पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु ।
लुब्धेन सञ्चितं द्रव्यं समूलं हि विनश्यति ।।

 - मुंग्यांनी साठवून ठेवलेले धान्य, मधमाशांनी साठविलेला मध आणि लोभी माणसाने साठविलेले द्रव्य यांचा संपूर्ण नाश होतोच.
लोभमूलानि पापानि रसमूलाश्च व्याधयः |
इष्टमूलानि शोकानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||

- पापाचे मूळ हे लोभात आहे . रोगांचे मूळ हे रसांमध्ये (जिभेचे चोचले पुरवणाऱ्या चवींमध्ये) आहे. सतत कशाची तरी इच्छा धरणे हे दुःखाचे मूळ आहे. म्हणून ह्या तीनही गोष्टींचा त्याग करून सुखी व्हा.

यथा चित्तं तथा वाणी यथा वाणी तथा क्रिया |
चित्ते वाचि क्रियायां च साधूनाम् एकरूपता ||

- जे मनात आहे तेच बोलणे असते आणि जसे बोलणे तसेच वागणे असते. अशाप्रकारे चांगल्या माणसांचे मन, बोलणे आणि कृती यामध्ये एकरूपता असते. 
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं |
विरक्तस्य तृणं भार्या निःस्पृहस्य तृणं जगत् ||

- उदार माणसाला पैसा हा गवताप्रमाणे असतो. शूर माणसाला मरण गवताप्रमाणे असते . विरक्ताला बायको गवताप्रमाणे असते तर सर्व इच्छांमधून मुक्त झालेल्या माणसाला सगळे जगच गवताप्रमाणे असते. 
जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
स क्रमः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ||

- पाण्याचा थेंब थेंब जमा होऊन घागर पूर्ण भरते. तशाच प्रकारे सर्व विद्या, धर्म (पुण्य) आणि धन देखील थोडे थोडे जमा होत त्याचा मोठा साठा होतो.
अर्थानामर्जने दुःखमर्जितानां च रक्षणे |
आये दुःखं व्यये दुःखं धिगर्थाः कष्टसंश्रयाः ||

- पैसा मिळवताना त्रास असतो. मिळालेला पैसा जतन करताना त्रास होतो. पैसा आला तरी दुःख खर्च झाला तरी दुःख. अशाप्रकारे कायम त्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या पैशाचा धिक्कार असो.


विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् |
पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ||

-  विद्या असली की अंगी विनय येतो. विनयामुळे पात्रता (लायकी) येते. ती आली की धन मिळते . धनामुळे धर्मानुसार (आयुष्य जगण्याची पद्धत, पार पडायची कर्तव्ये या अर्थाने) जगता येते आणि त्यामुळे सुख मिळते.

हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।
 नीरक्षीरविवेके तु बकः बकः हंसः हंसः ||

- हंस पांढरा असतो आणि बगळा देखील पांढराच असतो. मग या दोघांमध्ये फरक काय? दूध आणि पाणी वेगळे करायची वेळ आल्यास मात्र हंस कोण आणि बगळा कोण हे ओळखू येते. (नीरक्षीरविवेक - म्हणजे दूध आणि पाणी एकमेकांपासून वेगळे करण्याचे कौशल्य हंसाकडे असते अशी समजूत आहे)
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ||

- कावळा काळा असतो आणि कोकिळ देखील काळाच असतो. मग दोघांमध्ये फरक तो काय ? वसंत ऋतू आल्यानंतर मात्र कावळा हा कावळा आणि कोकिळ हा कोकिळ आहे हे ओळखू येते. 
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावहः ||

(श्रीमद्भगवद्गीता)

- स्वतःचा धर्म (स्वभाव किंवा सहज वृत्ती या अर्थाने) दुसऱ्याच्या चांगल्या आणि सहज वाटणाऱ्या धर्मापेक्षा कितीही कमी आणि दोष असलेला वाटला तरीही तोच चांगला असतो. स्वतःच्या धर्माचे पालन करताना मरण आले तरी ते उत्तम पण दुसऱ्याचा धर्म आचरणे हे अजूनच भयावह आहे.
सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् |
सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां धृतः शरीरेण मृतः स जीवति ||

-ज्याप्रमाणे गडद अंधारात दिवा दिसला की तो शोभून दिसतो (त्याचा योग्य उपयोग असतो) त्याप्रमाणेच दुःख अनुभवल्यानंतर मिळालेले सुख शोभून दिसते. खूप सुखाचा अनुभव घेतल्यानंतर मात्र ज्या माणसाला दारिद्र्य (दुःख) अनुभवावे लागते तो धडधाकट शरीराचा जिवंत माणूस असला तरी मेलेल्या माणसाप्रमाणे होऊन जातो.
 सत्सङ्गात् भवति हि साधुता खलानां साधूनां न हि खलसङ्गमात् खलत्वम् |
आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते मृद्गन्धं न हि कुसुमानि धारयन्ति ||

- चांगल्या संगतीमुळे दुष्ट लोकांच्या अंगी सज्जनपणा येतो. दुष्ट लोकांबरोबर राहिल्याने सज्जन लोकांच्या अंगी दुष्टपणा येत नाही. फूल खाली पडले असता त्याचा सुवास मातीला येतो. मातीचा वास फुलाला लागत नाही.
दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ।।

- दान करणे , उपभोग घेणे आणि नाश होणे असे तीन मार्ग पैसा जाण्याचे आहेत. जो आपला पैसा दान करीत नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही त्याचा पैसा कायम तिसऱ्या मार्गाने जातो. (नष्ट होतो)
यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |
निरस्तपादपे देशे एरण्डोsपि द्रुमायते ||

- जेथे खरोखर विद्वान लोक नसतात अशा ठिकाणी थोडीफार बुद्धी असलेल्यांचीही खूप स्तुती होते. ज्या देशात झाडेच नाहीत अशा देशात एरंडाला पण झाडाचा दर्जा मिळतो.
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

- दुष्ट माणसे आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. एकतर चपलेने त्यांना ठेचायचे किंवा त्यांच्यापासून लांब रहायचे.