पृष्ठे

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं, हारा न चंद्रोज्वलाः
न स्नानं, न विलेपनं, न कुसुमं, नालङ्कृता मूर्धजा: |
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ||

- माणसाला केयूरामुळे (दंडावरील अलंकार) शोभा येत नाही किंवा चंद्राप्रमाणे तेजस्वी हाराने देखील नाही. स्नान केल्याने, सुगंधी द्रव्याने मालिश केल्याने, फुलांमुळे किंवा केस सुशोभीत केल्याने सुद्धा नाही.सुसंस्कृत वाचा (बोलणे) माणसाला अलंकृत करते. इतर सर्व अलंकार हळू हळू नष्ट होत जातात पण उत्तम वाचा हे खरे भूषण आहे (कारण ते कायम बरोबर रहाते).
शरदि न वर्षति, गर्जति, वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः |
नीचो वदति, न कुरुते, वदति न सुजनः, करोत्येव ||

- शरद ॠतू मधील ढग नुसतेच गरजतात पण बरसत नाहीत.याउलट वर्षाॠतूतील ढग अजिबात आवाज करीत नाहीत आणि पाऊस पाडतात.(तसेच) नीच लोक नुसतेच बोलतात करत काहीच नाहीत.सज्जन लोक मात्र न बोलता कृती करतात.(गरजेल तो पडेल काय)

दुर्जनः परिहर्तव्यो विद्यया भूषितोऽपि सन् |
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ||

- दुष्ट माणूस कितीही विद्याविभूषित असला तरीही त्याला टाळणेच उत्तम. अलंकाराने नटलेला असला तरीही साप भयंकर नसतो काय?

योजनानां सहस्राणि शनैर्गच्छेत्पिपीलिका |
अगच्छन् वैनतेयोऽपि पदमेकं न गच्छति ||

- हळू हळू चालत मुंगी हजारो योजने अंतर पार करून जाते. पण जागचा हललाच नाही तर गरुड़ एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही.
अर्थात, तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा उपयोगच केला नाही तर त्या क्षमतेला काही अर्थ नसतो.
अग्निदाहे न मे दुःखं छेदने निकषे न वा |
एतदेव महद्दुःखं गुञ्जया सह तोलनम् ||

- सोने म्हणते - मला आगीमध्ये तापविल्याने, तोडल्याने किंवा कस ठरविण्याने (त्यासाठी दगडावर घासल्याने)दुःख होत नाही.पण मला गुंजेसारख्या निकृष्ट प्रतीच्या पदार्थाबरोबर तोलले जाते याचे मात्र अतिशय दुःख होते.

ही सुवर्णान्योक्ती आहे . सोन्याला इतर कोणत्याही त्रासाचे दुःख वाटत नाही पण अपमानाचे वाटते.तसेच थोर माणसे कोणतेही दुःख सहन करतील पण त्यांना अपमानाचे दुःख असह्य होते.
वृक्षस्याग्रे फलं दृष्टं फलाग्रे वृक्षमेव च |
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः ||

- झाडाच्या टोकाला फळ आहे आणि फळाच्या टोकाला परत झाड आहे. त्याची सुरुवात "अ' ने होते तर शेवटी "स" आहे.हे जो ओळखेल तो खरा पंडित.(उत्तर - अननस)


उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा |
सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता ||

- उगवताना सूर्य लाल असतो तसाच तो मावळतानाही लाल असतो. अशाप्रकारे महान (थोर) लोक समृद्धीच्या आणि संकटाच्या अशा दोन्ही काळात एकसारखेच वागतात.

म्हणजेच संकटाने घाबरत नाहीत किंवा समृद्धीच्या काळात हुरळून जात नाहीत.