पृष्ठे

काममय एवायं पुरुष इति।
स यथाकामो भवति तत्क्रतुर्भवति।
यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते।
यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते॥

- तुमच्या मनात खोलवर रुजलेली जी इच्छा असते तसेच तुम्ही होता .कारण जशी तुमची इच्छा असेल तशीच तुमची ताकद असते ,जशी ताकद असते तसेच काम तुमच्या हातून होते आणि जसे काम तुम्ही करता त्यावरच तुमची नियती (भवितव्य) ठरते .
न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥

- केवळ केस पांढरे झाले आहेत (वयाने मोठे आहेत) म्हणून आदर मिळत नाही तर तरुण असूनही जे उत्तम शिकलेले, ज्ञानी आहेत त्यांनाच देव मोठे (आदरणीय) समजतात.
अगाधजलसंचारी गर्वं नायाति रोहितः ।
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥

- विशाल अशा (समुद्राच्या) पाण्यात राहून देखील रोहित माशाला (एकप्रकारचा मोठा मासा) (आपल्या शक्तीचा ) गर्व नसतो.छोट्याश्या डबक्यात रहाणारी बारीक शफरी मासोळी मात्र उगीचच उड्या मारत असते.
थोडक्यात - उथळ पाण्याला खळखळाट फार.
सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया |
यस्य न द्रवते चित्तं स वै मुक्तोऽथवा पशुः ||

- सुभाषिते , गाणे आणि सुंदर तरुणींच्या लीला बघून ज्याचे ह्रदय प्रफुल्लित होत नाही तो एकतर (सर्व इच्छा ,वासना यातून) मुक्त तरी झालेला आहे किंवा पशु तरी आहे .
रथस्यैकं चक्रं भुजगयामिता: सप्ततुरगाः
निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि |
रविर्यात्यन्तं प्रतिदिनमपारस्य नभसः
क्रियासिधिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे ||

- रथाला एकच चाक आहे, रथ हाकणारे साती घोड़े सापाने वेढलेले आहेत, काहीही आधार नसलेला रस्ता आहे आणि रथाचा सारथी एका पायाने अधू आहे, अशा सगळ्या अडचणी असताना देखील सूर्य अनंत अशा आकाशातून रोज मार्गक्रमण करीत असतो. महान लोकांची कार्यसिद्धी खरोखर त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांवर अवलंबून नसून त्यांच्या स्वतःच्या आतील शक्तीवर असते.
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ||

- अग्नी जेव्हा (वणव्याच्या रुपात) अख्खे जंगल नष्ट करतो तेव्हा वारा त्याला मित्राप्रमाणे मदत करतो.पण तोच वारा दिव्याच्या (म्हणजेच परत अग्नीच्या) मात्र नाशाला (दिवा विझवून टाकायला) कारणीभूत होतो.म्हणजे कोणी कोणाचा मित्र नसतो (हेच खरे).
वसन्ति कानने वृक्षाः फलपुष्पैश्च भूषिताः |
आम्रं विना परं चित्तं कोकिलस्य न तुष्यति ||

- वसंतॠतूमध्ये अरण्यातील वृक्ष फळाफुलांनी बहरून गेलेले असतात .पण कोकिळेचे मन मात्र आंब्याशिवाय संतुष्ट होत नाही.
ह्याला अन्योक्ती प्रकारचे सुभाषित म्हणता येईल. आजूबाजूला कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी काही लोकांचे मन एकाच विशिष्ट गोष्टीत गुंतून पडलेले असते आणि तिच्याशिवाय त्यांना खरा आनंद होत नाही.
सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||

- सोन्याची कमळे निर्माण करणारे अनेक शिल्पकार असतात. परंतु सुवासिक कमळे निर्माण करण्याचे कौशल्य फक्त ब्रह्मदेवाकडेच (चतुरानन = चार तोंडे असलेला म्हणजेच ब्रह्मदेव) असते.
साधोः प्रकोपितस्यापि मनो नायाति विक्रियाम्।
न हि तापयितुं शक्यं सागराम्भस्तृणोल्कया ||

- जसे समुद्राचे पाणी केवळ वाळलेले गवत वापरून तापत नाही तसेच इतर लोकांनी कितीही दबाव आणला तरीही द्रष्टया माणसांचे मन आपल्या योग्य निर्णयापासून ढळत नाही.
आरभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै:
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: |
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:
प्रारभ्य चोत्तमजना: न परित्यजन्ति ||

- कामात अडथळे येतील या भीतीने कामच सुरू न करणारे लोक नीच (अतिशय कमी) प्रतीचे , काम चालू असताना मधेच अडथळे आले तर ते अर्धवट सोडून देणारे लोक मध्यम प्रतीचे तर कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून पुन्हा पुन्हा काम सुरू ठेवणारे लोक अतिशय उत्तम प्रतीचे असतात.
लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः |
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्
नतु प्रतिनिविष्टमूर्खजन चित्तमाराधयेत् ||

- प्रयत्नपूर्वक जर वाळू रगडली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, तहानेने व्याकूळ झालेला आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्याला एखाद्या वेळेस सशाचे शिंगही सापडेल. (अशा सर्व अशक्य वाटणार्या गोष्टीही कदाचित साध्य होतील) पण मूर्ख आणि हेकेखोर माणसाची समजूत कधीही घालता येणार नाही.
कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विन:।
मूर्ध्नि वा सर्वलोकस्य विशीर्येत वनेऽथवा॥

- महान लोकांची अवस्था फुलांच्या गुच्छाप्रमाणेच दोन प्रकारची असू शकते. एकतर ती सर्व जगाच्या डोक्यावर दिमाखाने रहातात किंवा एकटीच वनात झुरून मरून जातात (नाश पावतात).
ह्यापेक्षा इतर कोणत्याही अवस्थेत रहाण्यासाठी आवश्यक असणारी तडजोड ते करत नाहीत.
इतरतापशतानि यदृच्छया
वितर तानि सहे चतुरानन |
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख ||

- हे ब्रह्मदेवा , तुला हवे ते इतर शंभर ताप माझ्या वाट्याला दे . मी ते सहन करेन. पण अरसिक माणसाला कविता सांगण्याचा ताप मात्र माझ्या कपाळी कदापि लिहू नकोस! लिहू नकोस !! लिहू नकोस!!!
जिह्वे प्रमाणं जानीहि भाषणे भोजनेऽपि च |
अत्युक्तिरतिभुक्तिश्च सद्य: प्राणापहारिणी ||

- हे जिव्हे (जिभे) , खाताना आणि बोलताना आपल्या मर्यादा ओळख. अति बोलणे आणि अति खाणे ह्या दोन्ही गोष्टी जीव घेणाऱ्या आहेत.
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मी: स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||

- संपत्तीमुळे आंधळ्या झालेल्या हे मूर्ख माणसा, संकटात सापडलेल्या माणसाला का हसत आहेस? लक्ष्मी (पैसा) एका ठिकाणी स्थिर रहात नाही यात विचित्र ते काय ? विहिरीवर ह्या रहाटाला लावलेला घडा बघ, रिकामा झालेला परत भरतो आणि भरलेला परत रिकामा होतो.
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त:।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक्ताञ्च तं च मदनं च इमां च मां च ||

-मी जिचा सतत विचार करतो ती माझ्याबाबतीत विरक्त आहे, तिला दुसराच कोणी आवडतो आणि त्याला अजून वेगळीच कोणीतरी आवडते. अजून तिसरीच कोणीतरी माझी अभिलाषा धरून आहे .तिचा ,त्याचा ,मदनाचा ,त्या स्त्रीचा आणि माझाही धिक्कार असो.
रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्बोधा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

- हे चातक पक्ष्या, सावध होऊन एक क्षणभर ऐक. आकाशात खूप सारे ढग आहेत ,पण सर्वच एकसारखे नाहीत. त्यापैकी काहीच ढग पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करणारे आहेत तर काही विनाकारण गर्जना करणारे पण पाऊस न पाडणारे आहेत. म्हणून जो जो ढग दिसेल त्याच्याकडे पाण्याची याचना करत फिरू नकोस.
हे अन्योक्ती प्रकारातले सुभाषित आहे. या प्रकारात मानव सोडून इतर कोणालातरी (जसे चातक, मोर ,बगळा इत्यादी) व्यवहारातील उपदेश असतो पण तो माणसालाही वेगळ्या संदर्भात लागू पडतो. जसे वरील सुभाषितातून, माणसाने आपल्याला खरंच मदत करणारे कोण आणि नुसत्याच वल्गना करणारे कोण हे नीट ओळखून त्याप्रमाणे वागावे असा अर्थ लावता येतो.
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः |
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे ||

- प्रत्येक माणसाची बुद्धी (विचार) वेगळा, प्रत्येक सरोवरातील पाणी वेगळे , प्रत्येक जातीत असलेले आचार (वागण्याची पद्धत) वेगळे आणि प्रत्येक मुखातून बाहेर पडणारे बोलणे वेगळे .
मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् |
तद्रोषादिव निर्याता वदनाद्रदनावलिः ||

- काळ्या असलेल्या केसांनी पांढरेपणा धारण केला, हे बघून तोंडातले दात चिडून निघून गेले.(कारण दातांचा पांढरे असण्याचा गुणधर्म केसांनी चोरला).
माणसाला म्हातारपण आल्याचे कल्पक वर्णन केले आहे.
यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् |
लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति ||

- ज्याला स्वतःची हुशारी नाही त्याला शास्त्र (विद्या) काय करणार? एखाद्याला डोळेच नसतील तर त्याला आरशाचा काय उपयोग?
यथा देशस्तथा भाषा यथा राजा तथा प्रजा |
यथा भूमिस्तथा तोयं यथा बीजस्तथांकुरः ||

- जसा देश तशी भाषा , जसा राजा तशी प्रजा , जशी जमीन तसेच (त्यातून बाहेर येणारे) पाणी आणि जसे बी असेल तसाच (त्याला येणारा) अंकुर असतो.
मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिकदंशनम् |
तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति ||

- माकडाने दारू प्यायली, त्यात त्याला विंचू चावला आणि शिवाय त्याच्या अंगात भूत शिरले तर जे काही व्हायचे ते (अनिष्टच) होईल.
अत्यंत हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी हे सुभाषित आहे.
कान्तावियोगः स्वजनापमानं ऋणस्य शेषं कुनृपस्य सेवा।
दारिद्र्यभावाद्विमुखं च मित्रं विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

- पत्नीचा वियोग, आपल्या माणसांकडून झालेला अपमान ,शिल्लक राहिलेले कर्ज ,वाईट राजाची (मालकाची) सेवा करावी लागणे आणि दारिद्र्यात पाठ फिरविलेले मित्र ह्या पाच गोष्टी माणसाला कायम अग्नीशिवायच जाळतात.
न राज्यम् न च राजाः असीत् न दण्डयो न च दाण्डिकः ।
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्मः परस्परम् ||

- आदर्श समाजव्यवस्थेत ना कोणी राजा असतो , ना त्याचे राज्य असते.कोणी शिक्षा देणारा नसतो ,कोणी शिक्षा भोगणाराही नसतो. सर्व लोक धर्माने वागतात (आपल्या कर्तव्याचे नीट पालन करतात) आणि एकमेकांचे रक्षण करतात.
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः |
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ||

- रात्र संपेल , पहाट होईल , सूर्य उगवेल ,कमळे हसू लागतील (फुलतील) आणि मी येथून बाहेर पड़ेन असा विचार रात्री कमळ मिटल्याने त्यात अडकलेला भुंगा करीत आहे .पण अरेरे! काय हे दुर्दैव ! ते कमळ(च) हत्तीने उपटले.
लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् |
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||

- मुलगा पाच वर्षांचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत, नंतरची दहा वर्षे त्याला मारून (थोड़ा धाक दाखवून) शिस्त लावावी पण एकदा का तो सोळा वर्षांचा झाला की त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे.
स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः |
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ||

- आपली जागा सोडून भलतीकडेच असलेले दात,केस ,नखे आणि माणसे कधीच शोभून दिसत नाहीत.हे जाणून शहाण्या माणसाने स्वतःचे स्थान कधीही सोडू नये.
वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः
त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी
जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||

- झाडाच्या शेंड्यावर रहातो पण गरूड नाही, तीन डोळे आहेत पण शंकर नाही, भगवी वस्त्रे धारण केली आहेत पण साधू नाही, पाण्याने भरलेला आहे पण ढगही नाही आणि घडाही नाही. तर असा कोण? (उत्तर - नारळ )
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोSपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही |

-ज्याप्रमाणे माणसे आपले जुने झालेले कपडे टाकून नवीन वस्त्रे धारण करतात त्याप्रमाणेच आत्मा जुने झालेले शरीर सोडून देऊन नवीन शरीर धारण करतो.
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वन्दिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

- ती सुंदर नगरी, त्या नगरीचा तो महान राजा, त्याचे मांडलिक असणारया राजांचा तो समूह , त्याच्या आजुबाजूला असणारी विद्वान लोकांची सभा , चंद्राप्रमाणे सुंदर चेहेरयाच्या स्त्रिया , उदंड असा राजपुत्रांचा समूह , स्तुती गाणारे भाट आणि त्या भाटांनी गायलेल्या त्या उत्तमोत्तम स्तुती हे सर्व ज्याच्यामुळे आता केवळ आठवणींमध्ये उरले आहे अशा काळाला नमस्कार असो.
अर्थात काळाच्या ओघात काहीच शिल्लक रहात नाही.
भोजनान्ते पिबेत् तक्रं दिनान्ते च पिबेत् पयः|
निशान्ते च पिबेत् वारि वैद्यस्य किं प्रयोजनम् ||

- जेवणानंतर ताक प्यावे, दिवस संपला की दूध प्यावे आणि रात्र संपली की (सकाळी) पाणी प्यावे.असे केले तर वैद्याची काय गरज ?
क्वचित् काणो भवेत्साधुः क्वचित् गानी पतिव्रता |
विरलदन्तः क्वचिन्मूर्ख: खल्वाटो निर्धनः क्वचित् ||

- तिरळा मनुष्य क्वचितच सज्जन असतो, गाणारी बाई (कलावंतीण) क्वचितच पतिव्रता असते, विरळ दात असलेला मनुष्य क्वचितच मूर्ख असतो आणि टक्कल पडलेला माणूस क्वचितच दरिद्री असतो.
अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च।
पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं कारयेत् ||

- शिल्लक राहिलेली आग , शिल्लक राहिलेले कर्ज आणि शिल्लक असलेला शत्रु हे पुन्हा पुन्हा बलवान होऊ शकतात (आणि त्रास देऊ शकतात) म्हणून ह्या गोष्टी कधीही थोड्यादेखील शिल्लक ठेवू नयेत.
अर्थातुराणां न गुरुर्न बन्धुः कामातुराणां न भयं न लज्जा।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला ||

- पैशाच्या मागे लागलेला माणूस गुरू काय किंवा भाऊ काय काहीही जाणत नाही, कामविव्हल माणसाला ना कशाची भीती असते ना लाज, विद्येच्या मागे असलेल्या माणसाला कधीही सुख (समाधान) आणि झोप नसते , भुकेलेल्याला वेळेची किंवा अन्नाच्या चवीची पर्वा नसते.
कश्चित् कस्यचित् मित्रं कश्चित् कस्यचित रिपुः।
कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवोऽपि वा ||

- (मुळात) कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रु नसतो .काही कारणामुळेच लोक एकमेकांचे मित्र किंवा शत्रु होतात.
को याति वशं लोके मुखे पिण्डेनपूरितः।
मृदङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वानिम् ||

- या जगात तोंडात काही घातल्यावर (कुठलीही लाच दिल्यावर) कोण वश होत नाही? मृदुंग देखील त्याच्या तोंडाला लेप लावल्यावरच मधुर आवाज काढतो
उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ||

- उद्योग (प्रयत्न) केल्यानेच कामे पूर्ण होतात नुसती स्वप्ने बघून नाही .झोपलेल्या सिंहाच्या जबड्यात हरणे स्वत:हून प्रवेश करीत नाहीत.(सिंहाला त्यांची शिकार करावीच लागते.)
अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद् गजभूषणम्।
चातुर्यम् भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम् ||

- वेग हे घोड्याचे भूषण आहे, माज हे हत्तीचे भूषण आहे, चातुर्य हे स्त्रियांचे भूषण आहे आणि उद्योग हे पुरुषांचे भूषणआहे.
मौनं , कालविलम्बः च,प्रयाणं, भूमीदर्शनम् |
भृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

- गप्प बसणे (दुर्लक्ष करणे) , वेळ वाया घालवणे (काम वेळेत न करणे) , (मुद्दाम) दुसरीकडे निघून जाणे , जमिनीकडे बघत रहाणे (काळजीत पडल्यासारखे दाखवणे ) , भुवया चढविणे (रागाचा आव आणणे) आणि दुसरयाशीच बोलत रहाणे (वेळ नाही असे दर्शविणे) ,नकार दाखविण्याचे हे सहा प्रकार आहेत.
भोजस्य भार्या मदविव्हलाया:
कराच्युतो हेमघटोपिपात्रम् |
सोपान मार्गेण प्रकरोति शब्दम्
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ||

- कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी जिन्यावरुन जात असताना तिच्या हातातील सोन्याचा घडा पडून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज झाला.
याच समस्यापूर्तीचे अजून एक सुभाषित येथे आहे.
मधुराम्ल लवण तिक्त कटु कषायश्च इति |
षड्रसा: पुरुषेणेहः भोक्तव्यां बलामिच्छिता ||

- ज्याला बळ (आरोग्य) कमवायचे आहे त्याने गोड (मधुर), आंबट (आम्ल) ,खारट (लवण), कडू (तिक्त) ,तिखट (कटु), तुरट (कषाय) या सहा रसांचे सेवन करावे.

शनै: कन्थः शनै: पन्थः शनै: पर्वतमूर्धनि |
शनै: विद्या शनै: वित्तम पञ्चैतानि शनै: शनै: ||

- घोंगडी विणणे , धर्मपालन , डोंगर चढ़णे , विद्याग्रहण आणि पैसा मिळवणे ह्या पाच गोष्टी हळू हळू कराव्यात.
शृङ्गार वीर करुणाद्भुत हास्य भयानक: |
विभत्स रौद्रौ शान्तस्य काव्ये नवरसा मता |

- शृंगार , वीर , करुण , अद्भुत ,हास्य , भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत हे काव्यातील (साहित्यातील) नवरस मानले जातात.
अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति नाम कौमारम् |
सद्भ्यो न रोचते सा असन्तोSप्यस्यै न रोचन्ते ||

- स्तुतिरुपी कन्या निवारण करण्यास कठीण असे कौमार्य अजूनही धारण करून आहे . कारण चांगल्या माणसांना ती आवडत नाही आणि वाईट माणसे तिला आवडत नाहीत .
विद्या विवादाय, धनं मदाय्, शक्ति: परेषां परिपीडनाय ।
खलस्य: साधो: विपरीतमेतद् ज्ञानाय, दानाय, च रक्षणाय ।।

- दुष्ट लोकांची विद्या वाद घालण्यासाठी , संपत्ती माज करण्यासाठी आणि शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी असते.चांगल्या माणसांच्या बाबतीत मात्र ह्याच्या उलटे असते. त्यांची विद्या ज्ञानासाठी (स्वतःला ज्ञान मिळावे म्हणून) , संपत्ती दान करण्यासाठी आणि शक्ती इतरांच्या रक्षणासाठी असते.
येषां बाहुबलं नास्ति येषां नास्ति मनोबलम् |
तेषां चन्द्रबलं किं करोत्यम्बरे स्थितं देवः ||

- ज्यांच्याकडे बाहुबळ (शक्ती) नाही आणि मनोबलही नाही त्यांच्यासाठी आकाशात असलेले चंद्रबळ आणि देव तरी काय करणार? (ग्रह-तारे , नशीब यावर अवलंबून ना रहाता मन आणि शरीर यांची शक्ती वाढवावी हे उत्तम )
अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रो बलिर्दद्यात, देवो दुर्बल घातकम् ||

- देवापुढे, घोड्याला नव्हे हत्तीला नव्हे वाघाला तर नाहीच नाही पण बोकडाला बळी देतात.म्हणजे देवसुद्धा दुर्बल लोकांचा घातच करतो. (थोडक्यात दुर्बलांचा देवसुद्धा वाली नसतो .म्हणून दुर्बल नसणेच चांगले.)
अञ्जलीस्थानी पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् |
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा ||

- ज्याप्रमाणे ओंजळीतील फुले डाव्या अणि उजव्या दोन्ही हातांना सुगंधीत करतात, म्हणजेच त्यांचे डाव्या अणि उजव्या हातावर सारखेच प्रेम असते त्याप्रमाणेच सज्जन (चांगले) लोक दुष्ट आणि सज्जन अशा दोन्ही प्रकारच्या माणसांवर सारखेच प्रेम करतात.

येथे "सुमनसां" या शब्दावर श्लेष आहे ."सुमनसां" = फुलांचे आणि "सुमनसां" = चांगले मन असणारे (सज्जन लोक). यामुळे दुसऱ्या ओळीचे दोन अर्थ होतात. तसेच "वाम"(डावा) आणि "दक्षिण" (उजवा) हाताचे रूपक दुष्ट आणि सज्जन लोक यांच्यासाठी वापरले आहे.
अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्|
उदारमनसानां तु वसुधैव कुटुंबकम्||

- हे माझे हे दुसरयांचे असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार /खुल्या मनाच्या लोकांना तर सर्व जग/पृथ्वी हेच एक कुटुंब आहे असे वाटत असते .
अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ||

- खूप खोल पाण्यात संचार करणारा रोहित मासा कधी गर्व करीत नाही.परंतु केवळ अंगठ्याइतक्या पाण्यात लहानशी शफरी मासळी मात्र सारखी फुरफुरत असते.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते |
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि ||

- हे लक्ष्मणा , जरी लंका कितीही सोन्याने मढलेली असली तरी मला इथे (लंकेत) चैन पडत नाही, कारण आई आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत.
न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरङ्गो न कदापि दृष्टः।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः॥

- सोन्याचे हरीण याआधी ना कधी कोणी पाहिले ना कधी कोणी ऐकले. तरीही (अशक्य गोष्ट असूनही)रामाला त्याचा मोह झाला.विनाश जवळ आला असेल तर माणसाची बुद्धी फिरते हेच खरे.
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥

- क्षमा हे दुबळ्यांचे बळ आहे तर बलवानांचे भूषण आहे. क्षमा केल्याने सर्व जग वश होते.(अशाप्रकारे) क्षमेने काय साधत नाही?
यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती |
तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती ||

- ज्या प्रकारे संगीत कैलास पर्वतापर्यंत नेते (येथे कैलास पर्वत हा अत्त्युच आनंद किंवा मोक्ष दर्शवत आहे ),त्या प्रकारे ना गंगा नेते ना सरस्वती .
यात संगीताचे महत्त्व सांगितले आहेच पण एका वेगळ्या प्रकारे.या सुभाषितातील दोन्ही ओळी पाहिल्या तर त्या सारख्याच आहेत असे दिसून येईल पण दोन्ही ओळींमध्ये शब्दांची फोड़ वेगळ्या प्रकारे केल्याने अर्थही वेगळा होतो.
निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फणा।
विषं भवतु वा माऽभूत् फटाटोपो भयङ्करः ||

- साप विषारी नसला तरी त्याने फणा काढ़णे महत्वाचे आहे .विष असो वा नसों, उभारलेला फणा हा कायमच भयानक दिसतो.
आशा नाम मनुष्यणाम् काचिदाश्चर्यशृङ्खला |
यथा बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङगुवत् ||

-आशा ही अशी एक अजब साखळी आहे जिने बांधल्यावर माणूस धावत सुटतो आणि जिने सोडल्यावर पांगळ्याप्रमाणे एका जागी उभा रहातो.